माजलगाव (बीड) : येथील देवकृपा ग्रुपचे अध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी स्वखर्चातून उभारलेल्या पवारवाडी येथील ३० स्वच्छतागृहांचे लोकार्पण रविवारी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी गावकऱ्यांना या स्वच्छतागृहांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
त्या पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘शासनाच्या योजना राबवितानाच समाजपरिवर्तनासाठी विविध घटकांचा पुढाकारही आवश्यक असतो. त्याशिवाय सर्वांगीण प्रगती अशक्य आहे. अनेक गावांत आजही महिलांना उघड्यावर शौचासाठी जावे लागते, ही मोठी शोकांतिका आहे. स्वच्छतागृहांसाठी शासन लाभार्थ्यांना अनुदान देते. त्यामुळे शौचालय बांधकामाकरिता सर्वांचा पुढाकार असणे गरजेचे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५८ टक्के शौचालये बांधण्यात आली आहेत. आप्पासाहेब जाधव यांनी स्वखर्चातून बांधलेल्या या स्वच्छतागृहांमुळे गावकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. त्यांचे काम कौतुकास्पद आहे.’
या वेळी आप्पासाहेब जाधव यांनी गावकऱ्यांच्या ऋणातून उतराई होता आले याचे समाधान असल्याची भावना व्यक्त केली. यापुढेही गावच्या विविध विकासकामांसाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पवारवाडीत स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधीसाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे येथे स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मुंडे यांच्याकडे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी स्मशानभूमी उभारण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार होत्या. आमदार आर. टी. देशमुख, नगराध्यक्ष सहाल चाऊस, बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे, जि. प. सदस्य कल्याण आबूज, नितीन नाईकनवरे, जि. प. सीईओ नामदेव ननावरे यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.